Monday, June 21, 2010

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग ३ अंतीम

अंक दुसरा.
माणुस तणावपुर्ण वातावरणात आनंद वाठारकर ला फोन करुन बोलावतो आणि देशमुख व चौधरी चपापतात, इथे पहिल्या अंकाचा पडदा पडतो..
दुसरा अंक सुरू होताना हाच प्रसंग पुढे चालू होतो. आपल्याला हळुहळू पण ठामपणे हे पटतय की माणुस हा कुणी माथेफिरु वा चिडखोर गृहस्थ नसुन, त्याने एका प्रकरणाचा पद्धतशीर अभ्यास करुन, पुर्ण तयारीनीशी तो ह्या संघर्षात उतरला आहे. कारण आजच्या जनतेला भेटण्याच्या देशमुखांच्या अपॉइंट्मेंटच्या वहीमधे पुढचे नाव वाठारकरचं आहे. आता हे सगळं हाताबाहेर जातय हे लक्षात आल्यावर देशमुख तब्येतीचं कारण पुढे करुन, माणसाला कटवण्याचा प्रयत्न करतात, पण माणसाकडे असलेले सज्जड पुरावे आणि त्याची चिकाटी, देशमुखांना आणि चौधरींना आपल्या जागी खीळवुन ठेवते, आणखी एक प्रमुख कारण आहे, देशमुखांना मिळणार असलेलं मंत्रीपद. ह्या संभाषणातच, माणसाची भुमीका स्पष्ट होउ लागते
देशमुख - हे इतकं ओरडुन सांगायला नको?
माणुस - ओरडल्याशीवाय प्रामाणिक माणसानं जगायच कस? जो माणुस फक्त स्वत:चा विचार करत नाही, दुसर्याच्या दु:खाच निवारण करणं हाच ज्याच्या जिवनाचा अर्थ आहे अशा माणसानं जगायचं कसं? होय माझ्या पोटात ढवळल्यासारखं होतं. ह्या क्षणीसुद्धा मला मळमळायला लागलं आहे. माझ्या हातुन एवढच होण्यासारखं आहे. माणसांनी काय फक्त आपल्यापुरतंच पहावं
देशमुख - शांत व्हा .. शांत व्हा..
माणुस - मला घाणेरडा म्हणु नका! कोणी केली ही घाण? ही तुम्ही केलेली घाण आहे!
चौधरी पुन्हा हे सगळ प्रकरण आपल्या पातळीवरुन तोलुन पहायचा, अंदाज घ्यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या प्रयत्नांना पहिल्यांदाच यश येताना दिसतं. माणसाच्या बरोबर आलेली चित्रा, ही वाठारकरची बायको आहे ह्याचा पहिल्यांदाच उलगडा होतो. पत्रकार वाठारकर, ह्यानं देशमुखांच्या कामाच्या पद्धतीविषयी एक लेख लीहिला होता तो, देशमुख व चौधरींनी दाबुन टकला, व त्याचा परिणाम वाठारकरची नोकरी जाण्यात झाला. हे अस्वस्थ करणारं सत्य आपल्याला समजतं. वाठारकर त्यामुळे दारुच्या आहारी गेला, ह्याचाही उलगडा होतो. आणि चौधरी आपली पुढची खेळी करतात, माणसाशी अजीबात न बोलता, ते चित्राला सर्व काही नीट करण्याच आमिष दाखवतात. इतक्या दारुण परीस्थीतली चित्रा, वाठारकरची नोकरी, घर, त्याची व्यसनमुक्ती, सर्वोत्तम डॉक्टरकडुन उपचार ह्या सगळ्या प्रलोभनामुळे प्रथमच कोसळ्ते. चौधरींच्या प्रस्तावाला होकार देते, आणि माणसाला प्रचंड धक्का बसतो. पण चित्राचे हे कोसळणं क्षणभराचं असतं. तो आवेग ओसरल्यांनंतर ती आपल्या मुळ विचाराशी प्रतारणा न करता, माणसाच्या बरोबर ठामपणे उभी राहाते.
चौधरी - (माणसाला)तुम्ही समजता कोण स्वतःला? हे सगळं पैसे मोजुन भाड्यानं बोलायला आणलय तुम्हाला..
चित्रा - खबरदार यांच्याविषयी असं बोलाल तर.. अत्यंत प्रामाणिक गृहस्थ आहेत हे..
चौधरी - मला हे प्रकरण मिटवायच आहे.. पण हे गृहस्थ...
चित्रा - स्वतःला भाड्यानं विकणारे नाही हे.. जगात सगळीच माणसं यांच्यासारखी असती तर...
पण आपल्याला प्रथमपासुनच आत कुठेतरी सतत जाणवतंय की हा संघर्ष चौधरी आणि माणसातला नाहिये, तो चित्रा आणि चौधरी यांच्यातलाही नाहिये. हा संघर्ष आहे माणुस आणि देशमुख यांच्यामधला. किंवा कदाचित देशमुख आणि देशमुख यांच्यातलाच खरंतर.
माणुस - ठिक आहे, मी आता तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, इथे येताना मी वाइटातल्या वाईट परिणामाला तयार होतो. पण आपल्या चर्चेमुळे मला खुप समाधान वातलं. मी तुम्हाला बोलायला भाग पादलं, एवढच नव्हे तर सौदाही करायला लावला. आता मला केव्हाही इथुन निघुन जाता येइल. मला कोण दोश देणार? मी? वाठारकर? चित्रा? तुम्ही? डॉ. चौधरी तर आनंदाने उड्या मारतील. पण माझ्याहिषेबी ते नसल्यासारखेच आहेत. एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला...
चौधरी - (हसतात) होय! ठार मेलेला!
माणुस - पण डॉक्टरसाहेब तुम्ही.. तुम्ही निराळे आहात. आता फक्त तुम्ही आणि मीच, मी इथुन गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलावणार. तुमच्या ह्या स्वीय सहकार्यांना घरी जायला सांगणार आणि इथे एकटेच राहाणार.
चौधरी - मला कंटाळा आलाय ह्या बडबडीचा
माणुन - (चौधरींच्या बडबडीकडे अजिबात लक्ष न देता) आणि मग तुम्हाला मनःशांती लाभाणार नाही. तुम्ही उदास व्हाल. स्वतःवरच चिडाल.. तोंडात एक विचित्र चव आल्यासारखी वाटेल तुम्हाला. तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे काय झालं? हा कोण होता? मला गुन्हेगार ठरवायला आला होता? माझा आत्मा हिरावुन न्यायला आला होता? तो म्हणजे ज्या काळात मी एक उपाशीपोटी ब्शिकणारा पण अत्यंत निर्मळ मनाचा कॉलेजविद्यार्थी होतो तो तर नव्हता तो? मग मी त्याला लाथ मारुन बाहेर का हाकललं? मी त्यालाच असं का नाही म्हणलं " मीनिट्भर थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे, न जाणो तु योग्य वेळीही आला असशील...."
आणि मग चौधरींची केविलवाणी धडपड लहान लहान होत जाते, माणुस आणि देशमुख यांचे अर्थगर्भ शब्द मोठे होत जातात. सुरु होतो एक अखंड संवाद. सतत झंकारणारा, शांत स्वर. विवेकाचा संवाद विचारांशी, आणि विचांरांचा संघर्ष विवेकाशी. ह्या ४-५ पानांमधे भाई इतकी प्रत्ययकारी वाक्यं लिहुन जातात की नाटकातली पात्र बाजुला राहुन आपलाच संवाद सुरु होतो एकेक्षणी, आपल्याच विवेकाशी. देशमुख शाश्वत सत्याच्या जवळ पोहोचतायत अस वाटत असतानाच, चौधरी आपली अप्रतीम इहवादी भुमिका वाटतात, क्षणभर ती आपल्याला पुर्ण पटतेही, पण पुढच्याच क्षणी माणुस त्यातला फोलपणा उलगडुन दाखवतो, एखाद्याच वाक्यात कारण माणुस जे काही बोलतो त्याला अत्यंत तर्कनीष्ठ विवेकाचं पाठबळ आहे..
आता आपल्यापुढे कसलाही गुंता नाहिये, आपल्यापुढे सरळसरळ दोन मार्ग आहेत, एक देशमुखांचा अर्थात माणसाचा आणि दुसरा चौधरींचा. ह्यापुढचं नाट्य आत्तापर्यंतच्या सगळ्या नाट्यविषयावर कडी करणारं आणि धक्कातंत्राचा सर्वोच्च शिरोबिंदू गाठणारं आहे.....
पण आत्ताच त्याविषयी लिहीणं योग्य होणार नाही.. ह्या नाटकातलं नाट्य सगळाच गौप्यस्फोट करुन गमावण्याइतका मी करंटा नाही, ह्या लेखाच्या मागच्या भागाच्या प्रतीक्रियांतुन काही जणांनी आपण नाटक वाचणार असल्याचं कळवल आहेच.. तेव्हा त्या रसभंगाच पाप माझ्या नावावर नको..

No comments:

Post a Comment