Sunday, August 22, 2010

तेजोनिधी सावरकर - लेख १ - माझे मृत्युपत्र

तेजोनीधी लोहगोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज.
सावरकर ह्या तेजोनिधी विषयी अनेकांनी आपली लेखणी आणि जीभ सतत गेली ५०-६० वर्ष चालवुन देखील हा 'सुर्य कोटी समः प्रभा' अजुन आवाक्यात येत नाही. तात्यारावांचे विचार मला समजले तसे तुमच्यापुढे मांडावेत आणि मांडता माडता मलाच ते जास्त कळावेत ह्या स्वार्थी विचाराने मी ही तात्यारावांच्या वरील लेखमाला चालु करत आहे. तात्यारावांच्या बद्दल काहिही लिहीताना, कुठे विसंगती आढळली तो दोष फक्त आणि फक्त माझाच समजावा.
ह्या मृत्युंजयाच्या 'दाहक परी संजीवक' अशा विचारांचा मागोवा घेताना, माझ्या लेखमालेच पहिलं पुष्प "माझे मृत्युपत्र" असावं हा योग यथोचीतच म्हणा.
१९१०च्या मार्च महिन्यामधे तात्याराव इंग्लंड मधे पकडले गेले तेव्हा त्यावेळच्या एकंदरीत परिस्थीतीनुसार पुन्हा त्याची त्यांच्या वहीनीशी भेट होणे अशक्यप्राय वाटत होते. तात्यारावांच आपल्या वाहिनीशी नातं लहानपणापासुन कीती हळवं होते ह्याविषयी नंतर संदर्भ येइलच, तर अशा अत्यंत पुजनीय वहीनीला आपल्या अटकेची कटु बातमी सांगण्याचं कठोर कर्तव्य करत असतानाच, आपण हातात घेतलेल्या कार्यातील उदात्त, दिव्य, श्रेयस मर्म विशद करणारं असं हे "माझं मृत्युपत्र" तात्यारावांनी लिहीलं.
त्यांनी लंडनमधल्या ब्रिक्स्टन जेलमधुन लीहिलेलं त्यावेळेला त्यांच्या जन्मातलं बहुदा शेवटचं ठरणार असलेलं हे काव्य.
( ह्या संपुर्ण काव्यात चार सर्ग आहेत, मी रसग्रहणासाठी शेवटचे दोन सर्ग घेतलेले आहेत. विवेचनात संदर्भासाठी पंक्तीक्रमांक टाकत आहे, रसभंग होणार नाही अशी अपेक्षा)
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, - १
तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला . - २
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्रसंघा, केले स्वयें दहन यौवन-देह्-भोगा - ३
त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. - ४
त्वत्स्थंडिलीं ढकलिलीं गृहवित्तमत्ता, दावानलांत वहिनी नवपुत्रकांता - ५
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारुण पुण्यसिंधू - ६
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय 'बाळ' झाला, त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला - ७
हें काय! असतो बंधु जरी सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी - ८
संतान ह्या भरतभूमिस तीस कोटी, जे मातृभक्ति-रत सज्जन धन्य होती. - ९
हे आपुले कुलही त्यामधि इश्वरांश, निर्वंश होउनी ठरेल अखंड-वंश - १०
की ते ठरोंही अथवा नठरो परंतू , हे मातृभू अम्ही असो परिपुर्ण-हेतू - ११
दिप्तानलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ - १२
ऐसें विसंचुनी अहो वहिनी! व्रतांते, पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेते - १३
श्रीपार्वती तप लरी हिमपर्वतीं ती, की विस्तवात हसल्या बहु राजपूती - १४
तें भारतीय अबला-बलतेज कांही, अद्यापि ह्या भरतभूमींत लुप्त नाही - १५
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र, वीरांगने तव सुवर्तन हो समग्र - १६
माझा निरोप तुज येथुनी हाच देवी, हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेंवी - १७
सप्रेम अर्पण असो प्रणतीं तुम्हांते, आलिगन प्रियकरां मम अंगनेतें. - १८
की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने, लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें, - १९
जें दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याचि वाण धरिंले करिं हे सतीचे. - २०
हे मातृभूमी, आतापर्यंत माझे मन, बुद्धी कविता, लेखन, वक्तृत्व हे सगळं फक्त तुझ्याच कारणी लावलं आहे, ह्या सगळ्यातुन फक्त तुझंच वर्णन, तुझीच सेवा करत आलो आहे -------- १,२
तुझं कार्य म्हणजे सर्व देवतांना आवडणारं पवित्र कर्तव्य , आणि तीच इश्वरसेवा मानुन आजपर्यंत मी माझे प्रिय स्नेही, मित्रवर्ग तुलाच अर्पण केले, माझे स्वतःच्या तारुण्यसुलभ यौवनलीला स्वतःच्या हातानी जाळुन भस्म केल्या केवळ तुझ्यासाठीच. --------- ३,४
तुझ्याच पुजेमधे माझे घर, पैसा, संपती अर्पण केली, माझा लहान मुल, माझी पत्नी आणि वहीनी, तुझ्या सेवेच्या वणव्यातच ढकलुन दिली. तुझ्या अग्नीमधे माझा अतीधैर्यवान मोठा भाउ आणि माझा लहान भाउ 'बाळ' ह्याचीही आहुती दिली. व आता माझा देहही मी त्याच यज्ञामधे समर्पण करत आहे.-------- ५,६,७
पण ह्यात मोठे ते काय, आम्ही जरी सात भाउ जरी असतो, तरी आम्ही सर्व तुझ्याच सेवेत बलिदान करुन कृतार्थ झालो असतो. कारण हे मातृभू तुझ्या तीस कोटी संतानापैकी जे कोणी तुझ्यासाठी बलीदान करतात त्यांचच आयुष्य सार्थकी लागतं. आणि आपला हा वंश सुधा त्या उदात्त इश्वरकार्यासाठीच निर्वंश होउनही अमर ठरेल. -------- ८,९,१०
आणि अस नाही झालं तर? तरीही खंत नाही. आम्ही मात्र आता संपुर्ण समाधानी आहोत, तुझ्या उद्धारासाठी, ह्या पवित्र कर्तव्यासाठीच आम्ही ह्या वणव्यात आमाचा स्वार्थे जाळुन केव्हाच कृतार्थ ठरलो आहोत. -------- ११,१२
तेव्हा हे लक्षात ठेउन माझे प्रिय वहिनी, आता तुम्हालाही या पवित्र कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे. तुम्हीही हिमालयावर जगादोद्धारासाठी तप करणार्‍या त्या पार्वतीप्रमाणे, अथवा स्वधर्मरक्षणासाठी हसत हसत ज्वालाजोहार करणार्‍या रजपुत स्त्रियांच्या प्रमाणे धिराने हे कर्तव्य करुन आपल्या वंशाचा उद्धार कराल.-------- १३,१४
तुमच्या ह्या अतीधैर्यशील व्रतपालनाने ते दिव्य भारतीय स्त्रियांचे तेज अजुनही ह्या देवभूमीत जागें आहे हेच सिद्ध होइल. -------- १५,१६
बाकी काय सांगावे, वहिनी - हाच माझा शेवटचा निरोप समजा, तुमच्या चरणावर डोकं ठेउन वंदन करणार्‍या ह्या तुमच्या मुलाला आषीर्वाद द्या. माझ्या लाडक्यांना आणि माझ्या पत्नीलाही हाच माझा शेवटचा संदेश. --------१७,१८
कारण आम्ही आंधळेपणाने हा निखार्‍यांचा मार्ग चोखळला नाहिये, आमच्या जाज्वल्य इतीहासाला आणि निसर्गदत्त कर्तव्याला साजेसंच असं हे दिव्य, दाहक, पवित्र कर्तव्य आम्ही सर्व विचाराअंतीच जाणतेपणानेच तर स्वीकारलय. -------- १९,२०
ह्या दाहक आणि करुण काव्यावर माझ्या क्षीण लेखणीतून कोणतेही भाष्य करण्याचा वेडा प्रयत्न मी करणार नाही, अर्थानं स्वयंसीद्ध अस हे काव्य केवळ संधी सोडवुन आणि थोडयाश्या सोप्या स्वरुपात मांडुन इथेच थांबतो...

No comments:

Post a Comment