Sunday, August 22, 2010

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.

"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी व्यक्त्याला विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, अणि घेतलाच तर विषयाला धरुन कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व. अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापुर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य बोलुन फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकु येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या शाळेपासुनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातुन एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच. शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवुन सांगायचे. नंतर त्यांना ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती, संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहेमीच जास्त आले. एकतर फलटणपासुन जवळ आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात अनेक भाषणं दाटुन आली आहेत आत्ता.  शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली, गांधी मैदानावरच विराट जनसमुदयापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या छोटेखानी हॉलमधे होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या हस्ते शाहुकलामंदीर मधे झालेला त्यांचा सत्कार. आणि त्यावेळेला अत्यंत आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार

खुप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा, विवेकानंदांचा वारसा शिकवला. खुप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणिव करुन दिली... जागल्या बनुन राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

No comments:

Post a Comment