Monday, June 21, 2010

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग ३ अंतीम

अंक दुसरा.
माणुस तणावपुर्ण वातावरणात आनंद वाठारकर ला फोन करुन बोलावतो आणि देशमुख व चौधरी चपापतात, इथे पहिल्या अंकाचा पडदा पडतो..
दुसरा अंक सुरू होताना हाच प्रसंग पुढे चालू होतो. आपल्याला हळुहळू पण ठामपणे हे पटतय की माणुस हा कुणी माथेफिरु वा चिडखोर गृहस्थ नसुन, त्याने एका प्रकरणाचा पद्धतशीर अभ्यास करुन, पुर्ण तयारीनीशी तो ह्या संघर्षात उतरला आहे. कारण आजच्या जनतेला भेटण्याच्या देशमुखांच्या अपॉइंट्मेंटच्या वहीमधे पुढचे नाव वाठारकरचं आहे. आता हे सगळं हाताबाहेर जातय हे लक्षात आल्यावर देशमुख तब्येतीचं कारण पुढे करुन, माणसाला कटवण्याचा प्रयत्न करतात, पण माणसाकडे असलेले सज्जड पुरावे आणि त्याची चिकाटी, देशमुखांना आणि चौधरींना आपल्या जागी खीळवुन ठेवते, आणखी एक प्रमुख कारण आहे, देशमुखांना मिळणार असलेलं मंत्रीपद. ह्या संभाषणातच, माणसाची भुमीका स्पष्ट होउ लागते
देशमुख - हे इतकं ओरडुन सांगायला नको?
माणुस - ओरडल्याशीवाय प्रामाणिक माणसानं जगायच कस? जो माणुस फक्त स्वत:चा विचार करत नाही, दुसर्याच्या दु:खाच निवारण करणं हाच ज्याच्या जिवनाचा अर्थ आहे अशा माणसानं जगायचं कसं? होय माझ्या पोटात ढवळल्यासारखं होतं. ह्या क्षणीसुद्धा मला मळमळायला लागलं आहे. माझ्या हातुन एवढच होण्यासारखं आहे. माणसांनी काय फक्त आपल्यापुरतंच पहावं
देशमुख - शांत व्हा .. शांत व्हा..
माणुस - मला घाणेरडा म्हणु नका! कोणी केली ही घाण? ही तुम्ही केलेली घाण आहे!
चौधरी पुन्हा हे सगळ प्रकरण आपल्या पातळीवरुन तोलुन पहायचा, अंदाज घ्यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या प्रयत्नांना पहिल्यांदाच यश येताना दिसतं. माणसाच्या बरोबर आलेली चित्रा, ही वाठारकरची बायको आहे ह्याचा पहिल्यांदाच उलगडा होतो. पत्रकार वाठारकर, ह्यानं देशमुखांच्या कामाच्या पद्धतीविषयी एक लेख लीहिला होता तो, देशमुख व चौधरींनी दाबुन टकला, व त्याचा परिणाम वाठारकरची नोकरी जाण्यात झाला. हे अस्वस्थ करणारं सत्य आपल्याला समजतं. वाठारकर त्यामुळे दारुच्या आहारी गेला, ह्याचाही उलगडा होतो. आणि चौधरी आपली पुढची खेळी करतात, माणसाशी अजीबात न बोलता, ते चित्राला सर्व काही नीट करण्याच आमिष दाखवतात. इतक्या दारुण परीस्थीतली चित्रा, वाठारकरची नोकरी, घर, त्याची व्यसनमुक्ती, सर्वोत्तम डॉक्टरकडुन उपचार ह्या सगळ्या प्रलोभनामुळे प्रथमच कोसळ्ते. चौधरींच्या प्रस्तावाला होकार देते, आणि माणसाला प्रचंड धक्का बसतो. पण चित्राचे हे कोसळणं क्षणभराचं असतं. तो आवेग ओसरल्यांनंतर ती आपल्या मुळ विचाराशी प्रतारणा न करता, माणसाच्या बरोबर ठामपणे उभी राहाते.
चौधरी - (माणसाला)तुम्ही समजता कोण स्वतःला? हे सगळं पैसे मोजुन भाड्यानं बोलायला आणलय तुम्हाला..
चित्रा - खबरदार यांच्याविषयी असं बोलाल तर.. अत्यंत प्रामाणिक गृहस्थ आहेत हे..
चौधरी - मला हे प्रकरण मिटवायच आहे.. पण हे गृहस्थ...
चित्रा - स्वतःला भाड्यानं विकणारे नाही हे.. जगात सगळीच माणसं यांच्यासारखी असती तर...
पण आपल्याला प्रथमपासुनच आत कुठेतरी सतत जाणवतंय की हा संघर्ष चौधरी आणि माणसातला नाहिये, तो चित्रा आणि चौधरी यांच्यातलाही नाहिये. हा संघर्ष आहे माणुस आणि देशमुख यांच्यामधला. किंवा कदाचित देशमुख आणि देशमुख यांच्यातलाच खरंतर.
माणुस - ठिक आहे, मी आता तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, इथे येताना मी वाइटातल्या वाईट परिणामाला तयार होतो. पण आपल्या चर्चेमुळे मला खुप समाधान वातलं. मी तुम्हाला बोलायला भाग पादलं, एवढच नव्हे तर सौदाही करायला लावला. आता मला केव्हाही इथुन निघुन जाता येइल. मला कोण दोश देणार? मी? वाठारकर? चित्रा? तुम्ही? डॉ. चौधरी तर आनंदाने उड्या मारतील. पण माझ्याहिषेबी ते नसल्यासारखेच आहेत. एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला...
चौधरी - (हसतात) होय! ठार मेलेला!
माणुस - पण डॉक्टरसाहेब तुम्ही.. तुम्ही निराळे आहात. आता फक्त तुम्ही आणि मीच, मी इथुन गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलावणार. तुमच्या ह्या स्वीय सहकार्यांना घरी जायला सांगणार आणि इथे एकटेच राहाणार.
चौधरी - मला कंटाळा आलाय ह्या बडबडीचा
माणुन - (चौधरींच्या बडबडीकडे अजिबात लक्ष न देता) आणि मग तुम्हाला मनःशांती लाभाणार नाही. तुम्ही उदास व्हाल. स्वतःवरच चिडाल.. तोंडात एक विचित्र चव आल्यासारखी वाटेल तुम्हाला. तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे काय झालं? हा कोण होता? मला गुन्हेगार ठरवायला आला होता? माझा आत्मा हिरावुन न्यायला आला होता? तो म्हणजे ज्या काळात मी एक उपाशीपोटी ब्शिकणारा पण अत्यंत निर्मळ मनाचा कॉलेजविद्यार्थी होतो तो तर नव्हता तो? मग मी त्याला लाथ मारुन बाहेर का हाकललं? मी त्यालाच असं का नाही म्हणलं " मीनिट्भर थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे, न जाणो तु योग्य वेळीही आला असशील...."
आणि मग चौधरींची केविलवाणी धडपड लहान लहान होत जाते, माणुस आणि देशमुख यांचे अर्थगर्भ शब्द मोठे होत जातात. सुरु होतो एक अखंड संवाद. सतत झंकारणारा, शांत स्वर. विवेकाचा संवाद विचारांशी, आणि विचांरांचा संघर्ष विवेकाशी. ह्या ४-५ पानांमधे भाई इतकी प्रत्ययकारी वाक्यं लिहुन जातात की नाटकातली पात्र बाजुला राहुन आपलाच संवाद सुरु होतो एकेक्षणी, आपल्याच विवेकाशी. देशमुख शाश्वत सत्याच्या जवळ पोहोचतायत अस वाटत असतानाच, चौधरी आपली अप्रतीम इहवादी भुमिका वाटतात, क्षणभर ती आपल्याला पुर्ण पटतेही, पण पुढच्याच क्षणी माणुस त्यातला फोलपणा उलगडुन दाखवतो, एखाद्याच वाक्यात कारण माणुस जे काही बोलतो त्याला अत्यंत तर्कनीष्ठ विवेकाचं पाठबळ आहे..
आता आपल्यापुढे कसलाही गुंता नाहिये, आपल्यापुढे सरळसरळ दोन मार्ग आहेत, एक देशमुखांचा अर्थात माणसाचा आणि दुसरा चौधरींचा. ह्यापुढचं नाट्य आत्तापर्यंतच्या सगळ्या नाट्यविषयावर कडी करणारं आणि धक्कातंत्राचा सर्वोच्च शिरोबिंदू गाठणारं आहे.....
पण आत्ताच त्याविषयी लिहीणं योग्य होणार नाही.. ह्या नाटकातलं नाट्य सगळाच गौप्यस्फोट करुन गमावण्याइतका मी करंटा नाही, ह्या लेखाच्या मागच्या भागाच्या प्रतीक्रियांतुन काही जणांनी आपण नाटक वाचणार असल्याचं कळवल आहेच.. तेव्हा त्या रसभंगाच पाप माझ्या नावावर नको..

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग २

अंक पहिला -
ह्या नाटकामधे पात्रे चारच आहेत डॉ. देशमुख, डॉ. चौधरी, माणुस, व चित्रा, पण संवादामधे इतारही काही महत्वाची पात्रे येउन जातात उदा. डॉ. कृष्णमुर्ती, वाठारकर, पेंडसे वगैरे.
ह्या अंकाच्या सुरुवातीलाच देशमुख त्यांच्या बायकोशी फोनवर बोलताहेत, तिला त्यांचे गुरू डॉ. कृष्णमुर्ती ना विमानतळावर रिसीव्ह करण्याविषयी सुचना देताहेत, ह्या काही संवादांमधुन आपल्याला देशमुखांचा करडा काटेकोर, व कर्तव्यतत्पर स्वभाव दिसतो. देशमुख आत्ता उपमंत्री आहेत व लवकरच आरोग्यमंत्री होणार आहेत, आत्ताची सहा ते आठ ही वेळ त्यांच्या जनतासंपर्काची आहे, त्यांचे सहाय्यक डॉ चौधरी भेटायला आलेल्या लोकाना केबिनमधे बोलावतात 'माणुस' व चित्रा प्रवेश करतात, ह्या क्षणापासुनच 'माणुस' आपला वेगळेपणा कुठलेही वेगळे संवाद न म्हणता पण ठळकपणे जाणवुन देतो. माणसाला संवादाला सुरुवात करायची आहे पण तो घुटमळतोय, देशमुखच त्याला बोलायला उद्युक्त करतात.
माणुस: (सर्व शक्ती गोळा केल्यासारखं) ठिक आहे, मी इथे आलोय असं सुचवायला की हे आपण सोडून द्या..
देशमुख: मी सोडून देऊ? काय सोडून देऊ? माझ्या नाही लक्षात येत काय सोडून देऊ?
माणुस: (खंबीरपणाने) आपले उपमंत्रीपद.
ईथे नाटकात ताण निर्माण व्हायला सुरूवात होते, देशमुख आधी चिडतात, उखडतात, नंतर डॉ चौधरी आपल्या पद्धतीने माणसाला हाताळू पाहतात.
चौधरी: तुम्ही काय जनतामंचाचे कार्यकर्ते आहात की काय? का कुठल्या चौकशी आयोगाचे सदस्य वगैरे? किंवा लोकनियुक्त प्रतिनिधी?. आहात कोण तुम्ही?
माणुस: हा.. हा.. आता आल लक्षात.... एक गंभीर सुचना करायला एक सामान्या माणुस इथे शिरतो.. याचा अर्थ.. याचा अर्थ हा की तो कोणीतरी बडा माणुस असला पाहिजे. आता आल माझ्या लक्षात.. अच्छा.. अच्छा.. त्या अर्थाने मी नगण्य माणुस आहे.
त्यानंतर संभाषणा चालु असताना त्या माणसाच्या हेतुबद्दल आपली उत्सुकता वाढतच जाते. ह्या सगळ्या संवादांमधुन पुलंनी नाटकाचा वेग तसुभारही कमी न होता एक रहस्यमय छटा सगळ्या संवादांवर कायम ठेवली आहे. माणसाच्याच बोलण्यातुन आपल्याला देशमुखांचा पुर्वेतीहास, त्यांचे आणि चौधरींचे पुर्वीपासुन बरोबर असणे, त्यांचे हृदयविकार केंद्र, तिथले देशमुखांचे स्थान असा सगळा पट उलगडू लागतो संभाषण थोडे हलकफुलक होतानाच 'आनंद वाठारकर'चा उल्लेख येतो आणि क्षणभर ह्या सगळ्याच्या पलिकडे असणार्‍या खर्‍या गंभीर विषय लख्खकन चमकुन जातो. चौधरी बेरकी आहेत त्यांना सगळे आठवतय पण ते सराईतपणे सगळ विसरल्याचा आव आणतायत.
नंतर माणुस सतत एकामागुन एक पुरावे, पत्रे, आरोप ह्यातुन असह्य दबाव निर्माण करतो, त्यावेळेला पुलंच्या लेखणीचे कौतूक वाटते. तो सगळा संघर्ष अजिबात आक्रस्ताळे पणा न करता केवळ तापमापकाची भुमिका घेउन ते वर्णन करतात, आपल्याला मात्र तो ताण असह्य होतो.
आता देशमुखांना आरोप कळाला आहे, पण त्यांची प्रतिष्ठा, पद त्यांना तो स्विकारु देत नाहिये, मग ते त्या हृदय्विकारकेंद्रात आपण घेतलेले कष्ट, आपल्यावरच्या जबाबदार्‍या, त्यावेळची परिस्थीती ह्या सगळ्या कारणांमधुन स्वतःच्याच विवेकाशी प्रतारणा करत आहेत, अगदी त्याच पटलावर आपल्याला चौधरींच्या प्रतिक्रियेचा कॉट्रास्ट स्पष्ट दिसतो. चौधरींना त्यांच्या विवेकाशी लढायचच नाहिये, त्यांना लढायचय ते माणसाशी, त्या आरोपांशी, चौधरी त्या माणसावर, वाठारकरवर, निरर्गल आरोप करीत राहातात. ह्या संघर्षामधे देशमुखांचे व चौधरींचे दोन मार्ग आपल्याला मनापासुन पटतात, पण पुढच्याच क्षणी माणुस एखाद्याच वाक्याने त्या जस्टिफिकेशनच्या चिंध्या ऊडवुन देतो.
शेवटी खुप तणावपुर्ण प्रसंगानंतर माणुस हे आरोप खरेखोटे करण्यासाठी वाठारकर ला फोन करुन बोलावतात आणि सगळ्या नाटकाचा प्लॉट बदलतो, नाटक अधिक गंभीर वळण घेत आणि पडदा पडतो.
ह्या अंकाचे वैशीष्ठ्य म्हणजे, त्यातले वेगवान संवाद, छोट्या छोट्या संवादातुन निर्माण होणारा अपुर्व संघर्ष
क्रमशः

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग १

एक झुंज वार्‍याशी हे पुलंच एक तुलनेन कमी लोकप्रिय नाटक, मी हे माझ्या महाविद्यालयीन आयुष्यातच वाचले, खरं सांगायचे तर तेव्हा झेपले नाही पण आपण काहीतरी अलौकीक वाचतोय याचा पुसटसा अंदाज नक्कीच आला. त्यानंतर अनेकवेळा हे नाटक वाचत गेलो आणि प्रत्येक वेळेला नविन, वेगळं उलगडत गेल.
हे खरंतर एक रुपांतरीत नाटक आहे, इथे रुपांतरीत हाच शब्द योग्य आहे कारण पुलं कधीही भाषांतर करीत नाहीत, केवळ भाषा वा लिपी न बदलता नाटकाची घटना, संघर्ष, पात्रे ईतकी बेमालुम उतरवतात की अगदी मुळ नाटक माहीत असेल तरी कुणाला शंकाही येउ नये कि ह्या कलाकृतीचा आत्मा अस्सल देशी नाहिये अशी, (अगदी हेच 'पिग्मॅलियन' संदर्भातही खरे आहे). 'झुंज'चा मुळ आधार म्हणजे "डोझोर्त्सेव' यांची 'द लास्ट अपॉइंट्मेंट' ही रशियन कलाकृती.
ह्या नाटकाला वरवर पाहता तसा काही खास विषयच नाहीये, पण ह्यातल्या संघर्षाची जातकुळीच वेगळी आहे. इथे पात्रे चारच, रंगमंचावर त्यांचे येणेजाणेही फारसे नाहीच, त्यामुळे पारंपारीक नाट्यगुणांचा तसा अभावच, पण दिलिप प्रभावळकर, सयाजी, सारखे कलाकार आणि वामन केंद्रेंसारखे दिग्दर्शकामुळेच हे नाटक पेलले गेले
एक सामान्य माणुस एका आरोग्यमंत्र्याच्या खोलीत शिरुन राजिनामा मागतो, स्वत:वर झालेल्या अन्यायासाठी नाही तर दुसर्‍या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तोही सगळ्या पुराव्यांनीशी, या घटनेतच इतके नाट्य आहे की इतर कुणाच्या लेखणीतुन उतरताना ते मुळचे नाट्य कदाचीत झाकोळुन गेल असते पण, भाईंच्या लेखणीतुन तर ते पानोपानी फुलतच जाताना दिसते
हा अफाट लाव्हासंघर्ष ईतक्या संयतपणे पानापानातुन वाहताना पाहुन मी कित्येकवेळेला शहारुन गेलो आहे, अजुनही जातो.
'झुंज' चा घटनाकाळही २ तास आणि ह्या नाटकाचा कालावधीही २ तास पण दोन तास आपण इतक्या वेगवेगळ्या भुमीकांतुन फिरुन येतो, की मला वैयक्तिकरीत्या तरी हे नाटक वाचल्यानंतर खुप वैचारीक थकवा येतो.
एका प्रवेशात एक पात्र बोलत असताना आपल्याला त्याचे म्हणणे अगदी पुर्ण पटते, आपण अगदी नकळत मान डोलावतो, पण पुढच्याच क्षणी, दुसरे पात्र विचातशृंखला ऐकवतं आणि आपल्या काळजात चर्रर्र होते कि क्षणभरापुर्वी आपण किती राक्षसी विचार करत होतो हे जाणवुन, आणि हा विचारलंबक चालुच राहातो सतत, पडदा पडेपर्यंत.
वाचकालाच त्या नाटकातली चार पात्रे नकळतपणे करुन सोडणे, त्या व्यक्तीरेखेचा विचार जगायला लावणे, हेच मला वाटते ह्या नाटकाचं सर्वात मोठे बलस्थान,
हे नाटक मला झेपेल तेवढे उलगडुन दाखवायचा एक क्षीण प्रयत्न करणार आहे, वर्ण्यविषय एवढा अफाट आहे की क्रमश: ची मदत घावी लागणारच.
क्रमशः
माझा लहानपणाचा काळ मि ज्या घरात काढला तिथे पाठिमागे एक छानस अंगण होतं. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीमधे माझा बराचसा वेळ ह्या अंगणात खेळण्यातच जायचा. एक आंब्याच झाड, एक पेरूचं, एक स्वस्तिकाचं अशी झाडे होती, आता ती फार मोठी वाटत नाहीत पण त्यावेळेला ती मोठीच झाडे होती माझ्याच उंचीच्या हिशेबात, थंडीत तिथे चुल मांडुन आंघोळीचं पाणीही तापवायचो आम्ही, पण त्या चुलीबद्दल फारस आठवत नाहिये आता. माझ्या मनात ह्या अंगणाला स्थान आहे ते एका निराळ्याच गोष्टी साठी. माझा स्वभाव लहानपणी जरा बुजरा, अबोल होता, मला कसलातरी न्युनगंड असावा बहुतेक त्याकाळी, कारण मला ९वी-१०वीत जाइपर्यंत फार जवळच्या मित्र-मैत्रिणी नव्हत्या. आमच्या गल्लीत मुले दुपारी एकत्र जमुन क्रिकेट वगैरे खेळायची पण मला फारसं यायचच नाही, म्हणुन मी जायचो नाही तिकडे.
काय असेल ते असो मला अश्या कित्येक दुपारी एकट्यानेच, स्वतःशीच रमवलेल्या आठवतात ते ह्या अंगणात. आमच्या अंगणात वेगवेगळ्या दिवसात असंख्य प्रकारचे किडे असायचे. मी इतक्या एकाग्रतेनं त्यांचं निरीक्षण करण्यात रमुन जायचा, की मला घरातुन हाक मारलेलही कळायच नाही कित्येकदा, त्यात दुपारी ११ ते ४-४:३० हा वेळ म्हणजे खुप मस्त असायचा, जेवण, झाकपाक होउन शक्यतो सगळी मंडळी निवांत असायची, कुण्णाकुण्णाला माझी आठवण यायची नाही, उलट यावेळेत दंगा न केल्याबद्दल कृतज्ञताच वाटत असेल कदाचीत. आणि मग मी त्या माझ्या बालमती गुंग करणार्‍या छोट्या जगात हरवुन जायचो.
सर्वात जास्त आठवतात ती 'सुरवंट'. हिवाळ्यात पेरुच्या झाडावर सुरवंट फार, कधी कधी आंब्यावर पण असतात. बोट- अर्ध बोट आकाराची काळी, करड्या, भुर्‍या रंगाची सुरवंट हा एक मजेशीर प्रकार असतो. त्यांची चाल लयदार, एखाद्या अळीसारखी, पण त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान लय बघत रहावीशी वाटते. चौथी पाचवीत असताना ही सुरवंट आम्ही पाळायचो पण, म्हणजे पुर्वी जुन्या त्या 'होम' की काहीतरी नावाच्या मोठ्या काडेपेट्या यायच्या, त्याच्यामधे पेरुची, आघाड्याची वा झेंडुची पानं भरुन त्यात सुरवंट पकडुन ठेवायचो, सतत पाने घालत रहायला लागायचं, काही दिवसानी सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करुन घेतं, मग ती काडेपेटी त्या कोषासकट बाहेर ठेवायची एखाद्या दगडावर, आणि त्यातुन फुलपाखरु बाहेर यायची वाट बघायची. कधीच दिसलं नाही माझ्या डोळ्यासमोर फुलपाखरू बाहेर येताना, मग खुप हिरमुसला व्हायचो मी, पण नेहेमी मोकळे कोष मात्र दिसायचे. सुरवंट घरात आणलं की खुप शिव्या खाव्या लागायच्या पण कसतरी लपवुन मी ती काडेपेटी आणायचोच घरात. ह्यात कष्ट काहीच पडायचे नाहीत अस नाहीये बरका. सुरवंट जराजरी लागले हाताला वा कुठेही त्वचेला कि प्रचंड खाजायचं, जरा बारकाइनं पाहिलं तर कोवळ्या त्वचेत रुतून बसलेले केसही दिसतात, खुप आग होते. ह्यावर उपाय असायचाच, जिथे सुरवंट लागलय त्या त्वचेवर जाड घोंगड्याने घासल्यावर ते केस निघुन जायचे आणि आग कमी व्हायची, आणखी एक हमखास उपाय म्हणजे झेंडुची पाने कुस्करुन लावणे, थंड वाटायचे एकदम.
तिथल्या तुतूच्या झाडावर गोल रंगीबेरंगी चकचकीत किडे दिसायचे, त्यावेळेला आम्हाला बीट्ल नाव माहीती नव्हतं आम्ही टॅक्सीकिडे म्हणायचो त्याला.
गवळण कीडा कधीमधीच दिसायचा, मात्र पानगळीच्या दिवसात काडीकीडा मात्र नेहेमी बघितलाय. वाळलेल्या पानात तो कीडा पायाखाली येउ नयी म्हणुन वाकुन चालायचो, शोधत शोधत.
पावसाच्या दिवसात तर ते सगळे नवं जग बघताना भानच रहायचं नाही, असंख्य प्रकारचे बेडुक ओरडायचे. एखादा बेडुक उडी मारुन कुठे जातोय त्याचा नजरेने पाठलाग करायचा, मग एखादा दुसराच बेडुक दिसायचा क्षणभर, आणि पहिला हरवुन जायचा. पावसाळ्यात आमच्या घराच्या मागच्या दाराला आम्ही एक लाकडी फळी बसवायचो आडवी, बेडुक येउ नयेत म्हणुन, पण तरी एखादा घरात शिरलाच तर त्याला झाडु घेउन बाहेर हाकलायची मोठ्ठी जबाबदारी माझ्यावरच. आत्तासुधा हे लीहीत असताना त्यांचा तो खर्जातला गलका माझ्या कानात तस्साच आहे. ते डराव डराव चं समुहगीत ऐकून आता किती वर्ष झाली कुणास ठाउक.
ह्याच दिवसात यायच्या त्या गोगलगायी. चालताना पायाखाली एखादीजरी गोगलगाय आली तरी प्रचंड किळस यायची, त्यात दोन प्रकार आठवतात, एक शंखाची गोगलगाय आणि एक बिनशंखाची. शंखाची गोगलगाय खुप शांत, कागदावर घेउन आम्ही बाहेर सोडुन यायचो, कध्धीच त्रास नाही द्यायचो, पण बिनशंखाची गोगलगाय खुप किळसवाणी, बोटभर लांब, दोन्ही टोकाला निमुळती, आपल्याच स्त्रावाची बारीक रेघ बनवत त्यावरुन सरकत येणारी ती वस्तु बघितली कि आम्ही डोळे मिटुन, एका जाड पुठ्ठ्यावर घेउन ती लांब बाहेर फेकायचो.
पहिल्या पावसाच्या आधी आठवडाभर अचानक एका संध्याकाळी 'चाचड' दिसायला लागायचे, म्हणजे इकडे पंखाच्या मुंग्या म्हणतात ते. अचानक यायचे कुठुनतरी खुप संख्येने, हे दिसायला लागले की आम्ही ओळखायचो की आठवड्याभरात पहिला पाउस नक्की. संध्याकाळी सगळे दिवे बंद करुन बसावं लागायचं. बरोबर प्रकाशाकडे आकर्षीत होतात हे कीडे. कधीकधी एक कागद तेलात बुडवुन ट्युबला दोर्‍याने बांधुन ठेवायचो चाचड येउ नयेत म्ह्यणुन. कमी यायचे त्यामुळे, पण यायचेच. रस्त्यावरच्या दिव्यांभोवती तर हजारोंच्या संख्येने असायचे.
आमचं घर कडीपाटाचं, त्यामुळे पाली पण असायच्या भरपुर, सारख्या चुकचुकायच्या संध्याकाळच्या वेळेला, रात्री अंधुक प्रकाशाची डोळ्याला सवय झाल्यावर एखाद्या पालीची किडे पकडण्यासाठीची शांत तपश्चर्या बघताबघताच झोप लागायची.
मुंगळे जमात खुप मजेशीर, सारखे आपले गडबडीत, तुरुतुरु कुठल्यातरी मोहीमेवर, चावल्यावर खुप झणझणायचं. पण ह्याचे निरिक्षण घरापेक्षा अंगणात करायला मजा यायची. समोर आलेल्या काट्याकुट्यातुन, दगडातुन मार्ग काढुन स्वारी धावतेय पुढे. यांच दिशेच भान खुप आश्चर्यकारक असतं, तुम्ही बोटाने कीतीही लांब उडवा, दोनतीन मीनिटात पुन्हा आहे त्या ठिकाणी येउन प्रवास चालु.
मुंग्यांमधे लाल मुंग्यांची फार भीती वाटायची, कधी चुकुन पाय पडला तर मी खुप जोरात थयथयाट करायचो जागच्याजागी. पण काळ्या मुंग्यांच्या वाटेला मात्र कधीच गेलो नाही, का कुणास ठाउक, खुप आदर वाटायचा ह्या काळ्या मुंग्यांच्याविषयी, ह्यांना धावर्‍या मुंग्या का म्हणतात ते बघितल्याशिवाय लक्षात नाही यायचे तुमच्या.
माती उकरताना कधीतरी गांडुळ दीसायचं पण लगेच वळवळत मातीच्या ढिगात नाहिसं व्हायचं.
आमच्या गावाला खिंडीतल्या गणपतीला जाताना, पावसाळ्यात 'पैसा' दिसायचा, शेकडो पाय असलेला, तपकीरी लाल रंगाचा हा किडा, काडिने थोडा स्पर्ष केला तर लगेच ते शेकडो पाय पोटाशी आवळुन घेउन, अंगाचा अगदी बंद्या रूपायासारखा गोल करुन, घरंगळत जायचा. ह्याच गणपतीच्या बाहेत प्राजक्ताचा थोरला पार होता, रातराणी, चाफाही होता. ह्या पारावर रात्री आठच्या सुमाराला, खुप काजवे जमा व्हायचे, सतत हवेत उडत असायचे. त्या काळ्या कातळावरुन शांतपणे चालत जाणारा, एका लयीत लुकलुकणारा काजवा परत कधी तसा दिसला नाही.
खुप काही मिळवुन दिलय ह्या सगळ्यांनी मला, शब्दांत नाही सांगता येणार सगळं. अगदी एकटं एकटं वाटायचं तेव्हा हि सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली, आणि नकळत माझ्या बालपणाचा भागच बनुन गेली. अजुन भरुन येतय ते सगळे हरवलेले क्षण आठवुन.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतो? निबरपणा म्हणजे मोठेपणा का हो?
आत्ता ह्याक्षणी मी परत त्याच ठिकाणी गेलो तर दिसतील का हे सगळे मला, का माझीच नजर बदललीये.

Monday, June 14, 2010

ओंगळ समस्त, आम्ही नंगे..

 कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेवर माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अ‍ॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्‍या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना..... तेवढ्यात प्रणव मुखर्जी चे स्टेटमेंट ऐकलं.."त्यवेळेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणुन, लोकक्षोभाचा विचार करुन आम्ही अ‍ॅन्डरसनला जाउ दिले"......म्हणजे पुन्हा खापर माझ्याच डोक्यावर.. पण त्यावेळेला कारखाना उभारताना काही तपासण्या झाल्या नसतील का?.... का त्यावर कुणी पर्यावरण खात्याच्या कारकुनाने पाचपन्नास रुपये घेउनच सही केली असेल.... मी काल ७/१२ घेताना दिली तीच असेल का ती नोट.... ईतकी रक्ताळलेली असुनही कशी चालली कुणास ठाउक....
मर्ढेकर हातात धरले कि नेहेमीच असं का होते.... सगळे प्रश्न शेवटी बुमरँगसारखे मलाच शोधत का येतात..

सत्तेचेच तुप | सत्तेचीच पोळी |
मानव्याची होळी | भाजाया ती ||
देवा ऐशी भूक | कासया दिलीस? |
झालो कासवीस | मीही नंगा ||
नंग्याचाच आता | येथे कारभार |
कोंडी आरपार | फोडा या ही ||
टिर्‍या अर्धपोट | जोवरी आहेत |
ओंगळ समस्त | आम्ही नंगे ||

- मर्ढेकर.

Friday, June 11, 2010

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - अंतिम भाग.

तिकडे केवळ सुकामेवा विकणारी अनेक दुकाने आहेत,(पण पिस्ते सोडुन ईतर सुकामेवा मध्यपूर्वेच्या ईतर देशात चांगला मिळतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.) त्यातले एक दस्तचिन् (दस्त -हात, चिन् - निवडलेले) हे खुप प्रसिद्ध आहे (अस त्यांनीच सांगितले, मला काय माहीती हास्य ) त्या दुकानात पिस्ते खरेदी करायला गेलो, (कारण तेवढेच परवडणारे होते, तेल आणि गालिचे, "मला" विकले तरी परवडणार नाही) Sad , माझ्या सहकार्‍याने हिन्दुस्थान, आमीताब वगैरे नेहेमीचा पाढा वाचल्यावर गडी खुशीत आला. मला चीक्कार प्रकार दाखवल्यावर मला सगळ्यात आवडलेला (चव नव्हे किंमत) निवडला. एक अत्यंत सुंदर लाकडात कोरलेले ईराणी सौदर्यवतीचे चित्र पण खरेदी केल (दुधाची तहान ताकावर..) छायाचित्रक सापडला तर छायाचित्र टाकेन इथेच.
शेवटचे २ दिवस सगळ्यांच्याकडुन जेवणाची आमंत्रणे येत होती, पण मी कुठेच जाउ नाही शकलो. काही स्थानीक पक्वान्नं मात्र खायला मिळाली Party . त्यातला एक "अ‍ॅश" (ह्यातला 'अ‍ॅ' म्हणताना हे लोक ईतक्या लडिवाळपणे जिभ आत घेउन उच्चारतात की, तो उच्चार आणि तो पदार्थ यात अधिक मोहक काय हे सांगणे कठिणच) हा पदार्थ विशेष आवडला, थोडिशी चकोल्यांसारखी (वरणफळं पण म्हणतात ह्याला, म्हणजे चकोल्यांना, अ‍ॅश ला नव्हे) चव लागते. बाकीपण पदार्थ ठिकच. लॅट्युस चा वापर जास्त करतात, फ्रेंचांचा प्रभाव जेवणावरही जास्त दिसतो.
आतापर्यंत माझ्या हॉटेलवाल्याकडुन हवा तो पदार्थ करुन घ्यायची युक्ती माहीत झाली होती, त्याला 'वीजाय' अशी हाक मारली कि तो काय वाट्टेल ते करुन द्यायचा. (अमिताभचे नाव कुठल्यातरी चित्रपटात विजय होतं म्हणे thinking ) त्यामुळे चरत होतो आणि फिरत होतो
पर्शियन संगीत ह्याविषयी बरेच काही लिहिले जाऊ शकते, पण दुर्दैवाने मी तितका जाणकार नाही, हे संगीत क्षणार्धात आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जाते, ते संथ पण कमालीचे स्फुर्तीप्रद सुर ऐकुन मला क्षणभर कुमारजींची निर्गुणी भजने आठवली. एका रेस्त्राँमधे बसलो असताना, वाढदिवसाला वाजवायची पारंपारीक ईराणी धुन ऐकली, पियानोवर बसलेला पांढरर्‍या केसाचा बाबा असे काही सुर आळवत तल्लीन झाला होता की मी कितीतरी वेळ चक्कचक्क पुढ्यातले ताट विसरुन डोळे मिटुन बसलो होतो. (मला समोरचे जेवण विसरायला लावणारे संगीत स्वर्गीयच असले पाहिजे) या 'तावलोदेत मोबारक' गाण्याचे अगदी यथार्थ वर्णन पर्शियन लोक करतात "मोस्ट ब्युटीफुल बर्थडे साँग ऑन धिस अर्थ" ईकडे ऐका हवेतर आणी स्व्रतःच ठरवा.
आताशा त्या पारंपारीक संगीतामधे काही नवीन प्रवाह येउन मिसळतायत, पण मूळ लहेजा आणि डौल कायम आहे. त्यांच्या जुन्या संगीतकारापैकी एक "अनोशिर्वान रोहानी" ह्यांच्या काही रचना अप्रतीमच आहेत (त्यांचेही 'तावलोदेत मोबारक' ऐकुन बघा याडच लागेल). गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या आंदोलनात काही लोकप्रिय संगीतकार, गायकांनी खास गाणी रचून, गाउन ते आंदोलन आपल्यापरीने पेटते ठेवले होते. मला सतत सकाळसंध्याकाळ गाडीमधे नवनव्या पर्शियन रचना ऐकण्याची मेजवानी मिळत होती. Party
पर्शियातला मुक्काम संपत आला होता, मी ह्या सुंदर देशातली प्रत्येक गोष्ट मनात साठऊन घेत होतो, पाय खरच निघत नव्हता, आपला मुक्कम अजुन काही दिवस असायला हवा होता असं सारखे वाटत होते, जाउद्या.. कुणाच उष्ट, कुठे, आणि किती दिवस सांडावे ह्याची काहीतरी नियतीयोजनाच असावी. (अशावेळी गदिमांच्या कडे उधारउसनवार नाही करणार तर कुणाकडे.. दोन ओंडक्यांची होते अकस्मात भेट.. एक लाट तोडी दोघा.. पुन्हा नाही गाठ) शेवटी सामान व मन आवरुन विमानतळावर येउन थांबलो.
परतीच्या प्रवासात ईराण एअरचे विमान होते. बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले. Crying (त्या कालच्या चित्रविक्रेत्त्याने कुठली फ्लाईट आहे? असे विचारले.. मला वाटले सहज विचारले असेल. पण मी ईराण एअर सांगितल्यावर आधिचे पॅकिंग फोडुन दुप्पट जाड पॅकिंग केले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती). ईराणी विमानकंपनी ही ईतर कुठेही नोकरी न मिळाल्यावर शेवटचा पर्याय म्हणुन त्या कर्मचार्‍यांनी निवडली असावी. ईराणी आकाशातल्या बाया बाहेरच्या ईराणी स्त्रियांच्या मानाने अगदीच सुमार होत्या. प्रत्येक गोष्ट अन्नछत्रात वाढल्यासारख्या वाढत होत्या. Crazy नविन विमानखरेदी बहुदा खोमेनीच्या काळातच थांबवली असावी. त्या विमानकंपनीत आपल्याकड्च्या काही चित्रपट समीक्षकानीही शिरकाव करुन घेतला असावा बहुतेक. ईतके सुरेख पर्शियन चित्रपट सोडून, तद्दन रटाळ चित्रपट संपला की अतीरद्दड गाणी कि परत अती फड्तूस चित्रपट अशे शोधुन लावत होते.
त्या प्रवासात काही भैय्ये (राजसाहेबांच्या ठसक्यात म्हणुन पहा बरं)पण होते, त्यांच्या बायका नखशिखांत ईराणी पोशाखात होत्या (अर्थात विमान मुंबईत उतरेपर्यंतच, हे लेकाचे बाकी सगळ्या देशात जाउन तिकडचे निर्बंध गपचुप पाळतात, ईकडे आले की दात येतात साल्याना.)
असो.. तर असा हा माझा पर्शियन अनुभव, तोडक्यामोडक्या शब्दात जसा जमेल तसा लिहीला आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है )
आवडला तर नक्की कळवा. (म्हणजे त्या बालवॉशींग्टनच्या कुर्‍हाडीसारखी दिसेल त्या विषयावर लेखणी चालवायला हुरुप येइल.)

Thursday, June 10, 2010

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग ३

माझ्या त्यापुढच्या मुक्कामामधे असे बरेच राजकीय पैलू आढळत गेले. माझ्या उत्सुकतेपोटी (पक्षी आगावपणामुळे) एखादा शब्द बोलला गेला त्या देशाच्या कुठल्याही परीस्थितीवर, की लोक भरभरुन बोलत रहायचे, कित्येक संदर्भ नवीन उलगडत जायचे, पण चुकूनही कोणी उपहासाने हसले नाही की रागावले नाही. माझ्या भक्तांपैकी काहीजण मागच्या निवडणुकीच्या वेळेला आंदोलनात भाग घेतलेलेही होते. सध्याच्या राष्ट्राध्यक्षानी निवडणुकीत बळाचा वापर करुन विजय मिळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यानंतर बराच राडा झाला होता, आंदोलनात ७० -७५ जण मरण पावले, माझ्या निरीक्षणानुसार ह्यात तथ्य असु शकेल कारण मला भेटलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी कुणीच रिकामटेकडे नव्हते. (सगळे जण लठ्ठ पगारावर उच्चपदसस्थ होते, तरिही कळवळून बोलत होते.. जरा दुर्मीळच असे दृश्य)
ईराणमधे कुणीही नागरीक राष्ट्राध्यक्ष्याच्या निवडणुकीला उभे राहु शकतो फक्त त्यासाठी त्याला ईमाम व मौलवींच्या धार्मीक समितीची मान्यता घ्यावी लागते (आणि ती फक्त त्यांच्याशी एकनिष्ठ राजकारण करणार्‍यानाच मिळते Crazy ).
मला भेटलेल्या कुणालाही सध्या अमेरीकेशी चालू असलेल्या भांडणात रस दिसला नाही. अमेरीकेबरोबर भांडण लवकर संपवावे जेणेकरून आर्थिक व ईतर निर्बंध संपतील असाच सूर दिसला. ईराणचा अणुकार्यक्रम फक्त उर्जाउत्त्पादनासाठी आहे हे त्यांच्या सरकारचे मत मात्र पटत नाही. मी ज्या कंपनीत गेलो होतो तीच देशाच्या गरजेपैकी ८३% वीज बनवत होती - सगळीच्या सगळी तेलापासुन. आणि ईतके मुबलक तेल उपलब्ध असताना ईराण अणुउर्जेकडे वळेल हे असंभवनीय. पण ईराण ओपेक मधला दुसर्‍या क्रमांकाचा तेल ओकणारा देश आहे हे लक्षात घेतलेत तर अमेरीकेचे ह्या देशाबद्दलचे चालू व भविष्यातील राजकारण समजायला हरकत नाही.(सध्याचे तेलाचे भाव पेट्रोल ५ लिटर/१ डॉलर व डिझेल ६० लिटर/१ डॉलर)
४-५ दिवस रोज प्रवचन संपल्यावर मी सतत कुणा ना कुणा बरोबर भटकत होतो शहरामध्ये. वाह्तुककोंडी ची परीस्थिती जगातल्या कुठ्ल्याही मोठ्या शहराप्रमाणेच चांगली किंवा वाईट आहे. अमेरीकेबरोबर वाकडे असल्याने अमेरिकन गाड्या दिसतच नाहीत. मोजक्या जपानी गाड्या दिसतात पण जवळजवळ ९०% गाड्या फ्रेंच बनावटीच्या, प्युजोट कंपनीच्या आहेत. वाहतुकीचा सर्वात मोठा विशेष म्हणजे गाडी जर एकमेकाला ठोकली तरच हॉर्न वाजवतात. (कदाचीत ठोकल्यावर तो चालू आहे का हे बघायलाही वाजवत असावेत).ही अजीबात अतिशयोक्ती नाहीये. एके दिवशी प्रवचन संपल्यावर हॉटेलवर जाताना जरा डोळा लागला. काही क्षणाने जाग आल्यावर मी दचकलोच, आम्ही ट्रॅफीकजॅम मधे अडकलो होतो, मागे पुढे हजारो गाड्या होत्या पण स्मशान शांतता.
भारतीय बनावटीची एकाच प्रकारची दुचाकी दिसली - बजाज पल्सर. काही जणांनी मला 'ठाठा' च्या US$२००० कार बद्दल विचारले (मी लगेच त्याच कंपनीने जग्वार व लँडरोव्हर विकत घेतलिये हे सांगुन ह्या तीनही कंपन्या माझ्याच बापाच्या असल्यासारखा भाव मारला)
ईराणची मुख्य निर्यात तीन गोष्टीत संपते - तेल, गालिचे व पिस्ते. मला फक्त ईराणी गालिचे व पिस्ते ह्याविशयीच लिहिणे भाग आहे ( कारण तेलावर डोळा ठेउन अमेरिकेला कांपीटीशान केल्यास ख्योळ खलास व्हायचा)
ईराणी कार्पेट्स हा एक अतीसुंदर प्रकार आहे, तलम, मखमली, गुबगुबीत, रेशमी, नक्षिदार्, रंगीबेरंगी नानावीध प्रकार बघायला खरच डोळे पुरे पडत नाहीत. अनंत प्रकारची कलाकुसर, कुराणातले प्रसंग, आणि सगळ्यावर कडी म्हणुन शेवटी त्याने मला पर्शियन सौंदर्यवतीचे चित्र असलेला रेशमी गालीचा दाखवला, भिंतीवर लावायचा, आपण खलास.. (तेवढी किंमत विचारण्यापुर्वी तुमच्या बुडाखाली गुबगुबीत गालिचा आहे याची खात्री करुन घ्या, पडलात तर कं ज ना. )
जेवढ्या प्रकारचे गालिचे तेवढ्याच असंख्य प्रकारचे पिस्ते, पिस्त्यामधे पण फ्लेवर्स असतात ह्या वाक्याचा अर्थ समजायलाच १० मिनिटे लागली (मला बापड्याला पिस्ता हा एकच फ्लेवर माहीती होता )

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग २

सकाळी उठल्यावर परत हॉटेलच्या तळमजल्यावर जाउन नाष्ट्यासाठी मॅनेजरकडे माधुकरी मागायला सुरुवात केली, आमच्या दोघांचा अगम्य भाषेत गोन्धळ घालुन झाल्यावर, तो मला हाताला धरून कीचन मधे घेउन गेला. त्या आचार्‍याने, मी आणि मॅनेजरने थोडावेळ ईंग्रजीशी झटापट केल्यावर मी परवलीचा शब्द उच्चारला - हिंन्दुस्थान, आमीताब बाछ्छान.. पुन्हा समोर बटाटे, टमाटे, लॅट्युस वगैरे.(चला दीवसातले एक महत्वाचे काम तर झाले.)पण गेल्या काही तासांच्या अनुभवावरुन या देशाविष्यी उत्सुकता तर निर्माण झाली होती. त्यानंतर दिवसभर ह्या देशाविषयी प्रवचनामध्ये भक्तगणांच्याकडून (मी मलाही न कळणार्‍या विषयातला कॉर्पोरेट ट्रेनर आहे.. उगाच समजूतीचा घोटाळा नको..) शक्य तितकी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. प्रत्येकाने त्या देशाची वेगवेगळी वैशीष्ठ्ये सांगितली पण एक सुर कायम होता - ईराणी सौंदर्यवती (बाकी याचा पुसटसा अंदाज वर्गातच आलाच होता.. माझ्याच वर्गात १२ पुरूष आणि ८ स्त्रिया.. चुकलो.. सुंदर स्त्रिया, पिस्ते आणि आमीताब बाछ्छान (काही ईराणी संस्कृतीचा अभिमान नसलेल्यांनी 'शॅहॅरूक खॅन' चं पण नाव घेतले, पण ते क्वचितच )
संध्याकाळी एका भक्ताबरोबर (अर्थातच आमीताभचा वशिला लाऊन ) तेहरान शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो, आणि समोर उलगडत गेला एक सुंदर अनुभव..
थोडेसे जुन्या पद्धतिचे तेहरान शहर, अगदीच गगनचुंबी ईमरतींचे जंगल नाही आणि अगदीच पूणेरी पेठा पण नाहीत, थोडी नजर उंचावल्यावर आश्चर्याचा सुखद धक्काच. शहराच्या शेजारी अवर्णनीय सुंदर बर्फाच्छादीत पर्वतमाला. (माझ्या मध्यमवर्गीय मना.. स्वेटर आणला नाही हे आत्ता आठवायलाच हवयं का?) पण ह्या सर्वाहूनही अधिक सुंदर म्हणजे पर्शियन सौंदर्यवती. (तिथेच ईराण म्हणजेच पर्शिया हे त्याने सांगीतल्यावर पुन्हा अत्यानंद..) रस्त्यावरुन जाणार्‍यायेणार्‍या पर्शियन ललना पाहणार्‍याच्या मानेचा नक्कीच करकोचा करतात, ८-१० जरी पर्शियन सौंदर्यवती आपल्या चित्रपटसृष्टीत आणुन सोडल्या तर सगळ्या हीरवीणींना .**लाच लावतील.. मला आधी कळेना 'पहावं की न पहावं' (चाल - टू बी.. ऑर नॉट टू बी ) पण माझ्या सर्व प्रवासात जवळ जवळ सगळ्या चालकांनी आणि स्थानीक सहकार्‍यांनी.. " पर्शियन विमेन, वेरी ब्युतीफूल.. सी सी.. " म्हणून मलाच प्रोत्साहन दिले (त्यातल्या काहिंच्या डोळ्यात ' सरड्याची धाव कुंपणापर्यन्त' असा भाव का दिसला बरें..).
ईस्लामी राजवट आणि शरीया कायदा असल्यामुळे स्त्रियांना सर्व शरीर झाकून घेण्याची सक्ती. सगळ्याजणी काळा गुढग्यापर्यंतचा कोट (खालची निळी तंग जीन्स कुठल्या शरीयात बसत असेल? ) आणि डोक्यावर काळा रुमाल केस झाकण्यासाठी वापरतात, फक्त चेहरा व हात दर्शनिय. पण हा पोशाखाचा निर्बंध वगळता बाकि काही निर्बंध मलातरी आढळले नाहीत. सर्व व्यवहारांत स्त्रियांचा बरोबरीने सहभाग दिसतो.(त्यातल्यात्यात ड्रायव्हिंग करणार्‍या स्त्रिया हॉर्न न वाजवता आडव्या येउन आपण शिव्या द्यायला तोंड उघड्ल्यावर गोड हसून सूसाट वेगाने निघूनही जातात)
ईस्लामी राजवटीच्या बाकि असहिष्णु खुणा मात्र सतत जाणवत राहातात,दूरचित्रवाणी वर फक्त तीनच वाहिन्या आणि प्रत्येक वाहिनीवर नखशिखांत झाकलेल्या स्त्री पुरुषांच्या मालीका. (तीकडची एकता कपूर काय विषय वापरत असेल बरं ? बाकी ती एकता कपूर असेल तर तिला विषय कशाला लागेल म्हणा..) दिवसातून ५ वेळा नमाजाच्या वेळेला तीनही वाहिन्यांवर कुठल्यातरी मुख्य अथवा ऊप मौलविंचे नमाज प्रक्षेपण कंपल्सरी..आपल्याकडे हॉटेल मधे टॉवेलसाबण ठेवतात तसे प्रत्येक खोलीत नमाजाची सतरंजी आणि कुराणातील आयते लीहिलेल्या मातिच्या प्रतिमा ठेवणे कंपल्सरी. संपूर्ण दारुबंदी.(काळ्याबाजारात मीळतेच..) लोकांना व्यक्त व्हायला साधने कमी म्हणूनच असेल कदाचीत पण ईराण हा जगातला चौथ्या क्रमांकाचा ब्लॉगर देश आहे.
देशाचा कायदा मुस्लिम, सरकार कट्टर मुस्लिम. लोक मात्र कमालीचे सहीष्णु आणि ह्या सगळ्या घोळाला कावलेले दीसले.(अर्थात आता बहुतेक देशांतील परीस्थिती पहाता सर्व सरकारे समुद्रात नेउन बुडविली तर लोक सगळेच चांगले.) मी त्यांचं सरकार, कायदे वगैरेंविषयी टोकरल्यावर (आगावपणा, दुसरं काय?) सर्वात जास्त ऐकलेले वाक्य म्हणजे " वुई आर फर्स्ट पर्शियन.. देन मुस्लिम्स" , त्यांच्याकडून कळालेला ईतिहास असा. अरबस्थानांतून जशी आक्रमणें पुर्वेला हींन्दुस्थान वर झाली तशी पश्चिमेला त्यांच्यावर झाली, त्यानंतर तेथील स्थानीक पारशी लोक परागंदा होउन, जीव वाचवून भारतात आले. (पर्शियन म्हणजेच आपल्याकडचे पारशी हे समजल्यावर पुन्हा एकदा अचंबा, आ वासणे वगैरे वगैरे..) मग मीपण टाटा, वाडिया वगैरे पारशांची नावे सांगून जवळीक वाढवली.
तसे अमेरीकाविरोधी बोलणारे माझ्या पाहण्यात कोणी आले नाहि. पण रस्त्यांवर मात्र अमेरीकाविरोधी फलक काय, अमेरिकेच्या झेंड्यावर क्षेपणास्त्रे काय. याही बाबतीत जरा टोकरल्यावर अमेरीका विरोध सापडलाच नाही उलट आमच्याच सरकार चे जरा अती होतय असा सूर आढळला.(एकाने खोमेनीच्या पोस्टरखालीच ऊभे राहून हे सांगीतल.)
भारताविषयी व मुख्यतः चित्रपट्सॄष्टीविषयी आतोनात उत्सुकता. (काय नशीब बघा मी स्वतः ईराणी चीत्रपटांचा भोक्ता आहे (माझीद़ माझिदी वगैरे.) पण कोणी त्यविषयी बोलेचना. ईराणी संगीत, चित्रपट ईतके अप्रतीम असताना त्यांना बॉलीवूड कसे सहन होते अल्ला जाणे.) सारखे हींदुस्थान, आमीताब बाछ्छान चालूच. मी कीतिही वेळा ईंडिया म्हणालो तरी त्यांच्या मुखी हींदुस्थानच. माझे प्रवचन ज्या रस्त्यावर होते त्याचे नावही गांधी स्ट्रीट. मी हींदुस्थानमधुन आलोय हे कळाल्यावर लोक जरा जास्त आपुलकीने आदरातिथ्य करत होते, अर्थात याला एक राजकीय पैलूही असु शकेल, एकाने मला ईराण-हींदुस्थान भाई भाई हेपण ऐकवले. ईराण-ईंडिया गॅस पाईपलाईन बद्दल म्हणाला " तो पाकीस्तान तेवढा मधे तडमडतोय ना.. नाहितर केव्हाच झाले असतं ते."
क्रमशः

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग १

पर्शिया ह्या शब्दाशी माझा संबंध याआधी फक्त दोन वेळा आला होता, पर्शियन मांजर आणि प्रिन्स ऑफ पर्शिया हा संगणक खेळ. त्यावेळी अजिबात वाटले नव्हते कि या नावाचा देश अस्तित्वात असू शकेल.
काही दिवसांपूर्वी ईराणला प्रवचन देण्याची सुपारी आल्यावर गडबडलो.. ईराण विशयी माझ्या ईष्ट (आणि अनिष्टही) मित्रांकडुन बरेच ऐकुन होतो, त्यावरून ह देश म्हणजे अगदिच हा.. आहे आसे वाटले होते.
आता हा देश जगाच्या पाठिवर कुठे आहे ते शोधण्यापासून सुरूवात, आता सुपारी घेतलिये म्हणल्यावर वि़ज़ा वगैरे लफडि आली,तो घेउन.(ईराणी विज़ा विषयी नंतर कधितरी सांगेन) राजधानी तेहरान मधे उतरलो (तिकिट मिळे पर्यन्त मी ईराणची राजधानी पर्शिया समजत होतो.) फक्त रात्री २ वाजता.(चाल - गावडेवाडीचा पत्ता, वार्‍यावरची वरात)
ईमाम खोमेनी (हा ईसम जिवन्त आहे का हो? thinking ) विमानतळावर असंख्य प्रश्नांनी वेढलेल्या अवस्थेत उतरलो (त्यातील पोटापाण्याचा प्रश्न जास्त जहाल) आणि माझ्या स्वागतला येणार असलेल्या चालकाला शोधु लागलो (हा आणखी एक प्रश्न, कारण आमचे अ‍ॅडमिनमामा, प्रत्येक शहरात तुम्हाला अगदि वाजतगाजत न्यायचि सोय केली आहे असे तोंड भरुन आश्वासन देतात (त्याच्या बापाचे काय जातय,प्रत्यक्षात लीफ्ट मागुन हॉटेल शोधायला जावे लागते))
त्या बिचारया चालकाने हातात नामफलक धरलेला असुनही मी येडबंबुसारखा त्याच्याकडे न बघता सगळा एअरपोर्ट शोधुन काढला. शेवटी तोच कीव येउन सामोरा आला( जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो का हो. thinking ) आणी त्यानंतर आमचा संवाद असा.. फक्त रात्री २ वाजता
मी: फ्रॉम अबकड कंपनि?
चालक: सालाम (सलाम चा ईतका गोड उच्चार नवीन होता)(च्यायची.. हा अवसर्ग कसा देतात.)
मी: आय अ‍ॅम फ्रॉम पफबभ कंपनी
चालक: सालाम
मी: बोंबला
चालक: हॉटेल?
मी: आर वी गोइन्ग स्ट्रैट टू द हॉटेल?
चालक:... क ख ग ची अगम्य भाषा (ऐकायला चांगल वाटत होते पण त्याने पोट भरत असते तर नोकरी कशाला केली असती)
मी: हॉटेल? हॉटेल? Angry
चालक: हॉठेल
मी: विल आय बि एबल टू ऑर्डर माय डीनर अ‍ॅट धिस अवर?
चालक: क ख ग.. (स्वगत : आयला हे अवघडच होत चाल्लाय)
मी: फूड, डीनर, ईट.. (हातवारे पण करून सम्पले thinking )
चालक: क ख ग.. (आणी तो माझी बॅग उचलून चालायला लागला, मी संपलोच )
मी: ईग्लिश?
चालक: नो ईन्ग्लिश.. पर्शियन?
मी: झक मारली अन विचारले ह्याला. (पोटाचा प्रश्न बिकट होत चाल्लाय)
चालक: हॉटेल (गपगुमान गाडीत जाउन बसलो,आणी गार वारं अंगावर घेत, थंड डोक्याने जेवण मिळवण्याचा कट रचायला लागलो )
मी: यू? तेहेरान?
चालक:... ( होकारार्थी काहितरी अगम्य )
मी: आय अ‍ॅम फ्रॉम ईंडीया.. ईंडीया..
चालक: ईंडीया.. ईंडीया.. हीदुस्थान? हीदुस्थान? ( हे त्याच्याच शब्दात) (त्याला अत्यानंद, माझा गोंधळ)
मी: येस हीदुस्थान (हुश्श्श्श्श्श्श्श्श)
चालक: सेंटर ईंडीया डेल्लि न्यु..? (त्याने हे ३ वेळा विचारले, बहुतेक माझी परीक्षा घेत असावा. नन्तर उजेड पडला - भारताची राजधानी नवी दिल्ली )
मी: येस येस.. सेंटर ईंडीया डेल्लि न्युच (संवाद तर होतोय ना..)
चालक: हीदुस्थान.. मूव्हि.. आमीताब बाछ्छान.. (युरेका युरेका .. मी सिटवरून केवळ सिटबेल्टमुळे पडतापडता वाचलो)
मी: येस येस आमीताब बाछ्छान.. मुव्हिज..
आणी त्यानंतर त्या चालकाने माझे हॉटेल शोधून देउन, त्या हॉटेलच्या मॅनेजरला माझ्या जेवणाविषयी सांगुन, मला जेवताना आग्रह करुन, मला रूममधे सोडुन, सकाळी लवकर न्यायला येतो हे सांगून बिचारा रात्री ३:४५ ला मार्गाला लागला (मला सारखी शंका येत होती की हा मलाच अमिताभ समजला का काय?)
क्रमशः